व्रत कथा
विष्णू

श्री सत्यनारायण व्रत कथा

5 अध्याय

18px
अध्याय 1
एकदा नैमिषारण्यात राहणार् या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणार् या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, “हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा.” ॥२॥ सूत सांगतात, “मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. ॥३॥ एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत (भारतात) आले. ॥४॥ आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दु:खे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून ॥५॥ कोणत्या साधनाने त्यांची दु:के नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. ॥६॥ त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला.” ॥७॥ नारद म्हणाले, “ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दु:खे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो.” ॥८॥ ॥९॥ नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णु नारदाजवळ बोलले. भगवानम्हणाले, “मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मीत्याचे समर्पक उत्तर देईन.” ॥१०॥ नारद म्हणाले, “हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दु:खे भॊगीत आहेत.” ॥११॥ नारद म्हणाले, “हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दु:खी लोकांची सर्व दु:खे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऎकण्यची इच्छा आहे.”॥१२॥ भगवान्म्हणतात, “हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दु:खे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. ॥१३॥ हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. ॥१४॥ या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. ॥१५॥ भगवान् विष्णूंचे भाषण ऎकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले, “हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते, ॥१६॥ ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा.” हे नारदाचे भाषण ऎकून भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत दु:ख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. ॥१७॥ तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यनारायणाचे पूजन करावे. ॥१८॥ ॥१९॥ केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद (सव्वा पावशेरे, सव्वा अच्छेर, सव्वा शेर इत्यादी प्रमाणे करून) भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२०॥ गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२१॥ आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऎकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बांधव सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजानादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरि देवघरात पवित्र ठिकाणि करावे. ॥२३॥ पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दु:खनाशाचा हाच एक सोप उपाय आहे.” ॥२४॥ सत्यनारायणकथेतीय प्रथम अध्याय या ठिकाणी पुरा झाला. ॥१॥ हरये नम: । श्रीसत्यनारायण

लाभ

• सत्यनारायण व्रत कोणीही करू शकतो — जात, वय, लिंग यांचा भेद नाही • पौर्णिमेला किंवा कोणत्याही शुभ दिवशी करता येते • कथा श्रवणाने सर्व पापांचा नाश होतो • धनधान्य, संतती, सौभाग्य प्राप्त होते • सर्व मनोकामना पूर्ण होतात • प्रसाद ग्रहण करणे अत्यंत महत्त्वाचे — अन्यथा व्रत अपूर्ण राहते • कथेतच भगवंतांनी फलश्रुती सांगितली आहे
#satyanarayan#vishnu#vrat#katha#pournima#skanda-purana