अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥
या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।
मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥
वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।
हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥
व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।
उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥
श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।
हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥
जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।
तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥
तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।
कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥
नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।
ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥
नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।
दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥
शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।
सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥
तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।
मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥
पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।
जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥
खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।
गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥
पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।
आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥
मुर्हा गांवचें संतरत्न । झिंगाजी तो होय जाण ।
तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥
या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।
परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥
मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।
जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥
आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।